भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका, रोहितचा षटकार,विराटची ऊर्जा?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना फक्त स्पर्धा नाही, तर कौशल्य, संयम आणि मानसिक ताकद यांची झुंज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत १५२ सामने खेळले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ८४ वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने ५८ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. काही सामने अनिर्णित राहिले, पण नेहमीच रोमांच टिकवला आहे. या मालिकेत सगळ्यांचे लक्ष झपाट्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे आहे. कारण सध्या भारतीय संघ नव्या खेळाडूंना संधी देत आहे, आणि विराट-रोहित यांनी कसोटी आणि टी ट्वेंटी मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने विचार केला आहे की पुढील विश्वचषक खेळतील का? निवड समिती त्यांना निवडेल का? या सर्व प्रश्नांमुळे जगाचे लक्ष या दोघांवर केंद्रित झाले आहे.
विराटसाठी ही मालिका आत्मविश्वास आणि सातत्य सिद्ध करण्याची संधी आहे. त्याची तीक्ष्ण नजर, मैदानावरची उर्जा आणि वेळोवेळी खेळ बदलणारी रणनीती ही भारताच्या विजयाची गुरुकिल्ली ठरते.
रोहित शर्मा मात्र या मालिकेतला मुख्य आकर्षण आहे. तो सध्या एका ऐतिहासिक टप्प्यावर उभा आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम तोडण्याची संधी आता फक्त त्याच्याकडे आहे. सध्या त्याने ३४४ षटकार मारले आहेत, तर विक्रमधारक शाहिद आफ्रिदीच्या नावावर ३५१ षटकार आहेत. फक्त सहा षटकारांच्या अंतरावर तो इतिहास घडवू शकतो.
या येणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत, विशेषत पहिल्याच सामन्यात, तो हा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी साधू शकतो. रोहितच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटका मैदानात गगनभेदी उर्जा भरतो, प्रेक्षकांची उभी गर्दी जणू थरकापलेली आहे. जर त्याने पहिल्याच सामन्यात हा विक्रम साध्य केला, तर तो फक्त आकडेवारीतले नाव नाही, तर भावनांचा आणि प्रेरणेचा क्षण ठरेल.
ऑस्ट्रेलियात खेळणे नेहमीच एक आव्हान असते. पिचचा वेग, हवामानातील बदल, गोलंदाजांचा अनुभव आणि प्रेक्षकांचा दडपण हे सगळे खेळाडूंवर दबाव आणतात. पण भारतीय संघाकडे अनुभव, कौशल्य आणि आत्मविश्वास आहे. शुबमन गिल, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांसारखे खेळाडू संघात असल्यामुळे ही मालिका केवळ खेळ नाही, तर रंगतदार नाट्य बनते.
या मालिकेचं सौंदर्य म्हणजे प्रत्येक क्षण काहीतरी नवीन शिकवतो. कधी ती रणनीती, कधी संयम, तर कधी आक्रमकतेची झलक. आणि जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र येतात, तेव्हा सामना फक्त निकालावर संपत नाही तो क्रिकेटच्या आत्म्याला पुन्हा जिवंत करतो.
विराटच्या डोळ्यांतला संघर्ष, रोहितच्या बॅटमधला गर्जना, आणि भारतीय संघाचा लढाऊ आत्मा. हे सगळे मिळून या मालिकेला अविस्मरणीय बनवतात. प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत की रोहितचा तो पहिला षटकार कधी येईल, आणि तो त्याचं नाव इतिहासात कोरून टाकेल की नाही. तसेच, विराट आणि रोहितच्या भविष्यातील विश्वचषक खेळण्याची शक्यता या मालिकेतून अनेकदा स्पष्ट होईल, आणि त्यासाठी चाहत्यांची नजर सतत त्यांच्यावर असेल. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया मध्ये मालिका विजय मिळवावा अशी इच्छा बाळगणारे अनेक क्रिकेटरसिक विराट आणि रोहित यांची कामगिरी चांगली व्हावी, पुढे ते विश्वचषक स्पर्धेत खेळून अजून एक गौरव मिळवण्यासाठी सिद्ध असावे म्हणून देव पाण्यात ठेवले असतील. त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील यश वा अपयश हे आपसूक महत्वाचे झाले आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे की ते तिथेच काय कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होतील. तरीही आगामी ऑस्ट्रेलिया दौरा अनपेक्षितरीत्या महत्वाचा झालाय हे मान्य करावे लागेलच.
असो पुढचा नवीन लेख घेऊन येईपर्यंत विश्रांती घेतो पण हा असणार आहे केवळ एक स्वल्पविराम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा